नेहमी इतरांच्या अपेक्षा पूर्ण करणारी तू ! जेंव्हा स्वतःच्या अपेक्षापूर्तीची वेळ येते तेंव्हा का दुसऱ्याकडे बघते ?
माहीत असतं तुला नाहीच येणार कुणाच्या लक्षात तुझ्या अंतर्मनात चाललेली घालमेल... कारण तूच लावतेस रोज चेहऱ्यावर सगळं काही आलबेल असल्याचा लेप !
वावरत असतेस सगळीकडे अगदी त्याच उत्साहात...
कारण ठाऊक असते तुला जरा जरी हलली तुझ्या चेहऱ्यावरील हास्याची रेषा तरी बिघडेल साऱ्याच घराचा समतोल !
म्हणून लढत असतेस तू स्वतःच्या लढाया अगदी बिनबोभाट...
पण किती लढशील शेवटी आराम हवा असतोच की मग ते थकलेलं शरीर असो अथवा मन !
पण नाही, तू बघत बसतेस वाट कुणी तरी येईल म्हणेल "थकलीस का गं ? जरा आराम कर किती धावशील"
पण नाहीच येत कुणी, तू सुद्धा एक हाडा-मासाचं माणूस आहेस हे समजून घेणारं आणि मग तू हिरमुसतेस थोडी, डबडबतात डोळे पण मनाची समजूत घालून घालून पुन्हा लागतेस तू तुझ्या जीवलगांच्या अपेक्षापूर्तीला !
कारण तुझ्याही नकळत मुरलेली असते तुझ्यात ही पिढीजात सवय !
एरवी गाढ झोपेत असतांना देखील हलकीशी टकटक ऐकून धावत जाऊन दरवाजा उघडणारी तू, जेंव्हा उठतात स्वतःच्या मनात भावनांच्या लाटा त्यावेळी इतकी संयत कशी असू शकतेस ?
का अडवतेस आतलं वादळ !
का नाकारतेस की तुझं शरीरही पंचमहाभूतांनी बनलेलं आहे त्याला सुद्धा राग, लोभ, सुख-दुःख, वेदना ह्या साऱ्या भावना आहेतच कि आणी ह्या सगळ्यांचा निचरा हा व्हायलाच हवा. तोही योग्य वेळी. तरच होईल पुढची वाट सुकर.
केवळ कुणी समजून घ्यावं ही अपेक्षा करत बसण्यापेक्षा जशी इतरांच्या पुरवत असतेस अपेक्षा तशी हो स्वतःचा सुद्धा आधार ! कारण एक गोष्ट सदैव लक्षात ठेव तुला तुझ्या स्वतः इतकं कुणीच समजून घेऊ शकत नाही. तूच जर तुझा हात घट्ट धरून ठेवलास तर तो कुणीही कधीही काढून नाही घेऊ शकत.
इतरांना काहीच फरक पडणार नाही पण तूला निश्चित एक आश्वासक सखी मिळेल... कारण मुळातच तू इतक्या तुकड्यांमध्ये विभागलेली असतेस, मग आलीस थोडी स्वतःच्या वाट्याला तर काय फरक पडणार !
असंही प्रत्येक नात्याला तितकाच न्याय देण्याचं सामर्थ्य उपजतच असतं तुझ्यात..
Comments
Post a Comment