दिन दिन दिवाळी
गाई म्हशी ओवाळी
गाई म्हशी कोणाच्या
गाई म्हशी मामाच्या
दे ग आई खोबरयाची वाटी
*बामनाच्या पाठीवर मारेन काठी*
इडा पीडा टळू दे
*बळीच राज्य येऊ दे*
अशी म्हण हजारो वर्ष का चालत आली आहे?
हा बळी राजा कोण होता?
या दिवाळी च्या निमित्ताने करूया चिकित्स
दक्षीण दिशेची वैदिकांना असलेली भीती त्यांनी आपल्यावर देखील थोपवली आणी म्हणून दक्षिण दिशेला प्लॉट नको, दरवाजा नको . ती यमाची दिशा आहे असे आपल्यावर बिंबवण्यात आले.
*दक्षिण दिशेला काय आहे ?*
दक्षिणेला केरळ राज्य आहे.आणी केरळ येथेच महान्यायी, महाप्रतापी व दानशुर असा पुराणातला आम्हा अवैदीकांचा, रयतेचा राजा होऊन गेला. त्याचे नावं बळीराजा. बळीराजाचाच पणजोबा हिरण्यकश्यपू ,ज्याला राक्षस ठरवले गेले व त्याला मारण्यासाठी सिंहाचे मुकुट वाघनख असे बहुरूपी सोंग घेऊन खांबाच्या आडोशाला लपलेल्या विष्णूने ज्याला वैदीक "नृसींह अवतार " म्हणतात, त्या नृसिंह ने कपटाने हिरण्यकश्यपू ला मारले. कारण हिरण्यकश्यपू आपला फुटीरवादी पुत्र प्रल्हादला विष्णू या वैदीकाची बाजू घेण्याला विरोध करत होता. इथले जे मुलनिवासी अवैदीक होते ते सर्वच वैदीकांचा विरोध करायचे. कारण वैदीक यज्ञ करुन अवैदीकांची जमीन कब्जात घ्यायचे.
या प्रल्हादाच्या पोटी विरोचन जन्माला आला व त्याला देखिल असेच कपटाने मारले गेले. विरोचनच्या पोटी आणी प्रल्हाद चा नातू म्हणून हिरण्यकश्यपूच्या वंशातला हा *बळीराजा.*
ज्याची ख्याती वैदिकांना अक्षरशः डोकेदुखी ठरू लागली.म्हणूनच बळीला ब्राह्मण वामनानं पाताळात गाडलं. त्याचं कारण त्याच्या काळात बळी वर्णसंकर करत होता, वर्णव्यवस्थेला विरोध करत होता, त्याच्या काळात आदर्श समाजव्यवस्था होती म्हणून तो आदर्श समाजव्यवस्थेचा राजा होता.
नंतर नृश नावाचा राजा होता. अजगर पर्वात, महाभारत वनपर्वात, तो युधिष्ठिराशी वादविवाद करताना चातुर्वर्ण्य समाजाला विरोध करतो. शूद्र हे ब्राह्मणांशी बरोबरीनं आहेत हे सिद्ध करतो आणि युधिष्ठिराला निरुत्तर व्हावं लागतं. आणि हे तो राजर्षि असताना त्यानं केले म्हणून त्याच्या राज्यात ब्राह्मण वर्णानं बदनाम करून त्याला गणराज्याच्या बाहेर हाकललं. ही दोन उदाहरणं सांगतात की, त्या काळात जे लोकायतासारखे स्त्रीप्रधान पंथ होते, ते (चातुर्वर्ण्याला) विरोध करत होते. तर अशा प्रकारच्या तत्त्वज्ञानाचे जे पंथ आहेत, ते सबंध काळात या वर्णविषमतेला विरोध करत होते.
बळी पाताळात गेल्यावर सुध्दा त्याची लोकप्रियता कमी झाली नाही. आजदेखील दिवाळीला बहीण ओवाळतांना म्हणते "इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो ".
अशा या बळिराजाच्या राज्याकडे दक्षिण मुखी प्लॉट, घराचा दरवाजा, खिडकी काहीही नको व त्या दिशेला यमाची दिशा हे नाव देऊन आम्हाला भीती दाखवण्यात आली. बळीराजाच्या घराण्यातच नैऋत्ती नावाची कर्तबगार स्त्री होऊन गेली जिने शेतीचा शोध लावला तिला *अवदसा*म्हणून संबोधण्यात आले. व नैऋत्त दिशा देखील अशुभ सांगण्यात आली.
होलीका (होळी) पण याच घराण्यातली हिरण्यकश्यपूची बहिण व प्रल्हाद ची आत्या. (होळी या सणाला मी होलीका वर लेख लिहीलेला आहे) या सर्व मातृसत्ताक व्यवस्थेतल्या कर्तबगार महिला होत्या. त्या सर्वांना वैदीकांनी बदनाम केले व त्यांच्या भूलथापांना बळी पडतं आम्ही बहुजन अवैदीक पण आमच्या या पुराणातल्या आदर्शाना त्यांचीच री ओढत राक्षस ठरवतो खरे तर तेच आपले आदर्श.
*छद्म विज्ञान (Pseudo science)ची जोड*
दक्षिण दिशेच्या नफरतला सिध्द करण्यासाठी छद्म विज्ञान ची जोड देण्यात येते, आणी ती म्हणजे चुंबकीय लहरी या उत्तर-दक्षीण दिशेला वहातात त्याचा आपल्या शरीरावर, धंद्यावर दुष्परीणाम करतात. हे फक्त ढोबळ विधान आहे. विज्ञानात अशा प्रयोगांती सिध्द न झालेल्या गोष्टीला काही थारा नाही. बऱ्याच एम.आर.आय सेंटरमध्ये ते मशीन दिशा बघून ठेवलेले नसते या मशीन मध्ये सर्वात जास्त विद्युत चुंबकीय लहरी असतात त्यावर काही प्रभाव पडत नाही.
दक्षिण दिशा अशुभ नाही व ती भीती न बाळगणाऱ्या अनेकांचे हॉस्पीटल्स, कारखाने, दुकाने आज देखील दक्षिण मुखी असुन सुध्दा भरभराटीला आहेत.
*बळीप्रतिपदेला या शेतकरी राजाला आपण सर्व अभिवादन करतो.दिवाळीच्या बजबजपुरीत माझ्याकडून या महान राजाचे विस्मरण व्हावयास नको म्हणून अगोदरच विनम्र अभिवादन*
एक पुराणातला राजा बळी व दोन इतिहासातले राजे छत्रपती शिवराय व छत्रपति शाहू आमच्या कायम स्मरणात रहातील.
Comments
Post a Comment