Skip to main content

#शिवक्रांती आणि तिचे तात्त्विक अधिष्ठान..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यासंबंधीची चर्चा आधुनिक महाराष्ट्रात लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी सुरू केली, असे म्हणायला हरकत नाही. महाराजांच्या कार्याचा अन्वयार्थ लावण्याचे काम यापूर्वी कोणी केलेच नव्हते, असे नाही. आज्ञापत्राच्या कर्त्याने शिवाजीराजांनी नूतन सृष्टी निर्मिली असे म्हटले होते. त्याचे हे छोटेसे वाक्‍य केवढे अर्थगर्भ आहे!

परंतु, आधुनिक काळात आपला युरोपातील ज्ञानविज्ञानाशी संबंध आला व आपण त्यांच्याकडून घेतलेल्या नव्या “कॅटेगरिज’मधून विचार करू लागलो. आपल्याच जुन्या इतिहासाचा अन्वयार्थ नव्या संकल्पनांच्या साहाय्याने करू लागले. लोकहितवादींनी नेमके हेच केले. त्यांनी पूर्वजांवरील टीकेचा अतिरेक केला असे नेहमी म्हटले जाते. त्यात काही प्रमाणात तथ्यही आहे, पण मुळात ते परंपरेकडे अगदी वेगळ्या नजरेतून पाहात असल्यामुळे त्यांना ती परंपरा तशी दिसू लागली. ही वेगळी नजर त्यांना इंग्रजी शिक्षणातून मिळाली होती.

लोकहितवादींनी बंड आणि क्रांती यांच्यामध्ये भेद केला. शिवाजी महाराजांनी केलेले कृत्य हे साधे बंड नसून, क्रांती म्हणजे रिव्होल्यूशन असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. प्रचलित राज्यव्यवस्थेला उलथून टाकून दुसरी राज्यव्यवस्था स्थापन करते, ही बाब बंड आणि क्रांती या दोन्ही घटनांमध्ये समान असते; परंतु बंड म्हणजे फक्त सत्तांतर. या सत्तांतरामुळे नव्याने अस्तित्वात आलेली राज्यव्यवस्था अगोदरच्या राज्यव्यवस्थेहून मूल्यदृष्ट्य वरच्या पायरीची असेलच असे नाही. क्रांतीमुळे होणारे सत्तांतर मूल्याधिष्ठित असते व त्यामुळेच त्यातून निर्माण झालेली राज्यव्यवस्था ही अगोदरच्या राज्यव्यवस्थेपेक्षा उच्चतम असल्याचा दावा करता येतो. औरंगजेबाने विजापूरची आदिलशाही बुडवली व त्यामुळे ते राज्य दिल्लीच्या मोगल पातशाहीचा हिस्सा बनले; परंतु आदिलशाहीपेक्षा मोगल पातशाही ही उच्च कोटीची होती, असे कोणी म्हणत नाही. ते केवळ राज्यांतर होते, क्रांती नव्हती. शिवाजीराजांनी घडवून आणलेल्या सत्तांतराला क्रांती म्हणताना लोकहितवादींच्या डोळ्यांसमोर अर्थातच अमेरिकन आणि फ्रेंच राज्यक्रांत्या होत्या. अमेरिकन क्रांतीमुळे अमेरिकन संस्थाने इंग्लंडच्या साम्राज्यवादी जोखडातून मुक्त झाली व तेथे लोकशाही नावाच्या मूल्यव्यवस्थेला मानणारे नवे स्वतंत्र राष्ट्र उदयास आले. फ्रेंच राज्यक्रांतीने फ्रान्समधील राजेशाही संपुष्टात आणून तेथे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यत्रयीवर आधारलेली राज्यव्यवस्था स्थापण्याचा प्रयत्न केला.

प्रसिद्ध शतपत्रांमधील 1848 मध्ये छापलेल्या 25 क्रमांकाच्या या पत्रात लोकहितवादींनी “मूल्य’ हा जाडा शब्द वापरला नाही. ते या संदर्भात राज्यसुधारणा हा शब्द वापरतात; परंतु मूलभूत राज्यसुधारणा मूल्यानुसारच असतात. त्यामुळे तो शब्द आपण निर्धोकपणे वापरू शकतो.

लिबर्टी म्हणजे “स्वातंत्र्य’ हा अमेरिकन क्रांतीचा परवलीचा शब्द होता. जगप्रसिद्ध लिबर्टीचा पुतळा हे त्याचे प्रतीक होय. फ्रेंच क्रांतीने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे तीन शब्द परवलीचे केले. हीच ती तीन मूल्य होत. ही मूल्ये आपण बौद्ध धर्मापासून घेतली असे डॉ. आंबेडकर म्हणत. आता शिवराज्याला क्रांती म्हणायचे असेल तर अशी काही मूल्ये त्यामागे होती काय याचा धांडोळा घेतला पाहिजे.

फ्रेंच क्रांतीतील मूल्यांचा उद्‌घोष या क्रांतीचे अग्रदूत असलेल्या रुसो, व्हॉलतेर अशा विचारवंतांनी केला होता. तसे कोणी विचारवंत शिवक्रांतीच्या मागे पार्श्‍वभूमी म्हणून उभे होते काय, या प्रश्‍नाचे होकारार्थी उत्तर इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर यांनी दिले आहे. त्यांच्या मते स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन मूल्यांचा उद्‌घोष अनुक्रमे रामदास, एकनाथ आणि तुकाराम या संतांनी केलेला आढळतो.

शेजवलकरांचे हे मत फार महत्त्वाचे आहे. आधुनिक युरोपाच्या इतिहासाची सरणी मध्ययुगीन महाराष्ट्राला लावणे हे कदाचित कोणाला विपरीत वाटेल; परंतु मूल्यविचारसुद्धा परिस्थितीच्या संदर्भात सापेक्षतेने आणि साक्षेपाने करायचा असतो, हे विसरता कामा नये. येथील परिस्थितीत स्वातंत्र्य याचा अर्थ एकदम वयात आलेल्या सर्व स्त्री-पुरुषांना मतदानाने सरकार निवडण्याचा अधिकार, असा घेता येणार नाही हे उघड आहे.

शेजवलकरांनी शिवशाहीची जी तात्त्विक भूमिका सूत्ररूपाने सांगितले. तो न्या. म. गो. रानडेकृत मराठ्यांच्या सत्तेच्या उदयाच्या मीमांसेचा म्हटले तर सारांश आहे, म्हटले तर विश्‍लेषण आहे. न्यायमूर्ती रानडे यांनी मराठ्यांच्या सत्तेच्या उदयाची मीमांसा करताना संतांच्या कार्यामुळे शिवाजी महाराजांना अनुकूल वातावरण लाभले असल्याचे निदर्शनास आणले. राजारामशास्त्री भागवंतांचेही असेच मत होते. याच संदर्भात भागवत धर्म असा शब्दप्रयोग केला गेला. रानडे भागवतांचा भागवत धर्म पुरेसा समावेशक असल्यामुळे त्यात समर्थ रामदासांनी निर्देशलेल्या महाराष्ट्र धर्माचाही समावेश होत होता. वारकरी संतमालिकेतील ज्ञानेश्‍वर आणि नामदेव शिवकालापासून बऱ्याच अंतरावर असल्याने आणि एकनाथ नुकतेच होऊन गेलेले व तुकाराम अंशतः व रामदास पूर्णपणे समकालीन असल्यामुळे शेजवलकरांनी एकनाथ, तुकाराम व रामदास यांना शिवरायांच्या वैचारिक मशागतीचे श्रेय दिले. अशाप्रकारे लोकहितवादींनी चालना दिलेली मांडणी शेजवलकरांच्या हातून पूर्ण झाली.

शेजवलकरांनी लोकहितवादींच्या मर्मदृष्टीला अगदी मनापासून दाद दिलेली आहे. 28 मे 1848 या दिवशीच्या “प्रभाकरा’त आणलेल्या लोकहितवादींच्या उपरोक्त पत्राचा संदर्भ देऊन शेजवलकर लिहितात, “”इंग्लंडच्या इतिहासाचे दूध पिऊन पुष्ट झालेला हा पुण्याचा तरुण सरदार या प्रकाराकडे इतक्‍या शांतपणे पाहू शकला, ही अत्यंत कौतुकाची गोष्ट वाटते. मार्क्‍सच्या कम्युनिस्ट मॅनिफेस्टोचे वर्ष म्हणून या सालाकडे लाल डोळे करून पाहणाऱ्या साम्यवाद्यांनी यावरून पुष्कळ शिकण्यासारखे आहे.”

शेजवलकरांनी फ्रेंच राज्यक्रांतीतील तीन मूल्यांचा उल्लेख “मानवेतिहासाची प्रस्थानत्रयी’ असा करतात.

शेजवलकरांचे वैशिष्ट्य म्हणजे ते या तीन मूल्यांच्या परस्परसंबंधांचा आणि त्यांच्यातील प्राधान्यक्रमाचीही चर्चा करतात. या बाबतीतील त्यांचा अंतिम सिद्धान्त असा आहे, की “”पूर्ण, चिरंजीव, निःसंदिग्ध व प्रभावी स्वातंत्र्य अपेक्षित असले तर मात्र, समता व बंधुता या गोष्टी तितक्‍याच पूर्ण, शाश्‍वत व निःसंदिग्ध असाव्या लागतील.”

एके काळी पूर्ण स्वातंत्र्य उपभोगणारा आपला देश पारतंत्र्यात का गेला, याचे शेजवलकरांनी दिलेले उत्तर असे आहे, की “”अंतर्बाह्य समता व बंधुता यांच्या अभावामुळे आपण स्वातंत्र्यास वाचवले.”

आपण स्वातंत्र्य का गमावले या प्रश्‍नाचे उत्तर मिळाले म्हणजे आपण गमावलेले स्वातंत्र्य परत संपादन कसे केले, याचे उत्तर सहज मिळण्यासारखे आहे. गेलेले स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी मराठ्यांची एकी होणे गरजेचे होते. शेजवलकर सांगतात, की “”समतेच्या व बंधुतेच्या तत्त्वामुळे एकी शक्‍य झाली. तसेच समता व बंधुता ही क्रांतीची मूलतत्त्वे निर्माण झाल्यामुळे शिवकालीन समाज स्वातंत्र्य मिळवू शकला.”

लोकहितवादी सूचित शिवक्रांतीच्या स्वरूपाचे विवरण करताना शेजवलकर एक साधारण सिद्धान्त बांधतात, तो असा “”सामाजिक क्रांती होऊन प्रथम समता व बंधुता निर्माण झाल्यावाचून या देशाला स्वातंत्र्यलाभ नाही, हाच इतिहासाचा संदेश आहे.”

शेजवलकरांना हे असे सिद्धान्त करावे लागले याचे तत्कालीन कारण म्हणजे तेव्हा 1941 साली (महाराष्ट्रासह) भारत देश ब्रिटिश अमलाखाली होता. महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि हिंदुमहासभा यांच्यात तीव्र स्पर्धा होती. सावरकरांसारख्या एखादा दुसरा अपवाद सोडला तर हिंदुमहासभेचे बहुतेक लोक जातिभेद निर्मूलनादी सामाजिक सुधारणांना विरोध करीत होते. इतिहासाचार्य राजवाड्यांची विचारसरणी त्यांना शिरोधार्य असे. राजवाडे समतेच्या तत्त्वज्ञानाचे पूर्ण विरोधक. त्यांच्या मते राज्य मिळणे वा गमावणे या गोष्टींचा सामाजिक समता वगैरे गोष्टींशी काही संबंध नसतो. ज्याच्या तलवारीची लांबी जास्त किंवा ज्याच्या तोफाबंदुका अधिक पल्लेदार, तो जिंकतो.

राजवाडे यांनी लावलेल्या मराठ्यांच्या इतिहासाला अनुसरून राजकारण करणारे तेव्हाचे लोक असे म्हणत, की शिवकालात जातिव्यवस्था, स्त्रियांवरील बंधने, बालविवाहाची प्रथा इ. समतेच्या विरुद्ध प्रथा असूनही ज्या अर्थी स्वराज्य मिळाले, त्या अर्थी समता आणि स्वातंत्र्य यांचा काही अन्योन्यसंबंध नाही. सबब सामाजिक गुंत्यांच्या सोडवणुकीत शक्तीचा अपव्यय करून स्वातंत्र्य लांबणीवर टाकणे उचित ठरणार नाही.

आधी सामाजिक, की राजकीय या विषयावर लोकमान्य टिळक आणि गोपाळराव आगरकर यांच्यात झालेला वाद सर्वश्रुत आहे. आगरकर राजकीय स्वातंत्र्यासाठी सामाजिक सुधारणा स्थगित ठेवण्याच्या विरुद्ध होते, पण टिळक सामाजिक सुधारणा नकोतच असे म्हणत नव्हते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सुधारणा आपल्या आपण व आपल्या पद्धीने करू, असा त्यांचा आशावाद होता; परंतु लोकमान्यांची परंपरा सांगणारी, स्वराज्य पक्ष, प्रतिसहकार पक्ष, लोकशाही स्वराज्य पक्ष आणि हिंदुमहासभा अशा क्रमाने गांधीजींना विरोध करणाऱ्या या मंडळींना सामाजिक समतेचे जणू वावडेच होते. शेजवलकरांचे लेखन हे मुख्यतः या मंडळींचा प्रतिवाद करण्यासाठी झालेले आहे.

भरीत भर म्हणजे ही मंडळी शिवाजी आणि मराठ्यांचा इतिहास यांचे नेहमी उदात्तीकरण करायची. हिंदुराष्ट्रवादाचे समर्थन करण्यासाठी त्यांचा उपयोग करायचा. साहजिकपणे उपरोक्त मूल्यत्रयीतील स्वातंत्र्याचेच महत्त्व अधोरेखित होऊन उर्वरित पायाभूत मूल्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शेजवलकरांनी उल्लेखलेल्या तीन संतांपैकी दोघांना दूर सारून एकट्या रामदासांनाच सर्व श्रेय देणारा इतिहास त्यांनी रचला.

या सगळ्या परंपरेचा प्रतिवाद शेजवलकरांनी क्रांतीच्या मूलतत्त्वांचा महाराष्ट्रेतिहासातील अनुक्रम या लेखातून केलेला आहे. शिवकार्याची क्रांती असा यथार्थ व यथोचित गौरव करणाऱ्या लोकहितवादींना अशा क्रांतीतील सामाजिक आशयाचीही कल्पना होती, म्हणून तर त्यांनी आयुष्यभर ज्ञातिबांधवांचे शिव्याशाप झेलत समतेच्या तत्त्वाचा पुरस्कार केला. या तत्त्वाचे महत्त्व पटल्यामुळेच रानडे आणि भागवत यांनी संतांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. तत्त्वांच्या या प्रस्थानत्रयीतील स्वातंत्र्याला बाजूला काढण्याच्या राजवाड्यांच्या राजकारणातील डावपेचांचा एक भाग भागवत धर्मापासून महाराष्ट्र धर्म बाजूला काढणे हा होता. “”मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा” असे रामदास म्हणाले. ते नेमके केव्हा असा आडव्यात जाणारा प्रश्‍न न विचारता सुद्धा असे म्हणता येते. मराठ्यांनी एक झाल्याशिवाय महाराष्ट्र धर्म वाढणे शक्‍य नव्हते आणि मराठा तितुका मेळवण्याची कामगिरी भागवत धर्माच्या संतपरंपरेने समता आणि बंधुता या मूल्यांच्या आधारे बजावल्यामुळेच महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याची म्हणजे स्वराज्याची बोलणी शक्‍य झाली.

ज्याला आपण आधुनिकीकरण म्हटले, त्याच्यासाठीसुद्धा उपरोक्त तत्त्वे आवश्‍यक असतात, असे शेजवलकरांच्या लेखनातून निष्पन्न होते. “”शिवाजीने महाराष्ट्राच्या इतिहासाला जी कलाटणी दिली होती, तिच्यामागे आधुनिकीकरणाचे तत्त्वज्ञान होते. त्याने पश्‍चिम किनाऱ्यावरील दरवाजे उघडून पाश्‍चात्त्य सुधारणेच्या काळात इकडे आणण्याची तजवीज चालविली होती. परक्‍यांच्या व्यापाराला तर उत्तेजन द्यावयाचे, पण त्याबरोबर आरमार वाढवून त्यांचे —– करावयाचे, असा दुहेरी बेत शिवाजीने आखलेल्या अमात्यांच्या ———-वरून’ वरून स्पष्ट होतो.”

शेजवलकरांचा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा शिवराजांचे मोठेपण एका वेगळ्या पद्धतीने अधोरेखित करतो. “”सध्या सर्व इतिहासविवेचक अशी समजूत करून बसले आहेत, की हिंदुस्थानच्या स्थितीत अठराव्या शतकात काही सुधारणा शक्‍यच नव्हती. म्हणजे, पर्यायाने कोणा ना कोणा पाश्‍चात्त्य राष्ट्राचे प्रभुत्व मागेपुढे हिंदुस्थानावर होणे अपरिहार्य होते! ही विचारसरणी आम्हास मुळीच मान्य नाही. सतराव्या शतकापर्यंत अशी अंतर्गत सुधारणा मुसलमान राज्यकर्त्यांकडून अपेक्षित होती. कारण मक्का-मदिना, कायरो-इस्तंबूतपर्यंत त्याची “आमद्रफ्ती’ पूर्वीच चालू होती, पण सुधारणेपेक्षा संस्कृतीचा अनाधुनिक मूर्खपणाचा मार्ग औरंगजेबाने पत्करल्यामुळे ती नष्ट झाली. म्हणून शिवाजीला हिंदूंचे पुढारीपण स्वीकारून या सुधारणेचा पुरस्कार करणे भाग पडले! धर्मप्रकरणी शिवाजींचे वर्तन तत्कालीन युरोपच्या शंभर वर्षे पुढे होते.”

शेजवलकरांचे निरीक्षण यथार्थच आहे, पण शिवाजीमहाराज धर्माच्या बाबतीत युरोपच्या असे शंभर वर्षे पुढे जाऊ शकले, याचे कारणच मुळी हा धर्मविचार महाराष्ट्रात त्यांच्या अगोदर तीनशे वर्षे सातत्याने चालूच होता, हे आहे.

ग्रॅंट डफ काहीही म्हणो, मराठ्यांचे स्वराज्य हे केवळ आकस्मित योगायोग नव्हता, ती शिवक्रांती होती. तो वणवा नसून, समतेची अरणी आणि बंधुभावाचा मंथा या उपकरणांनी केलेले स्वातंत्र्याग्नीचे मंथन होते.

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

भावकी

🤔आमची भावकी चांगली आहे, म्हणणारे     👻फार दुर्मिळ आहेत , 🤔आमच्यासारखी भावकी कोणाचीच नाही,    👻असे म्हणणारे खूप आहेत . *खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी* 👹एवढी विकृत क...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...